आयुष्यावर बोलू काही – सुयोग शहा…
मनोगत
या मातीत रुजलो, सणा सोहळ्यात सजलो, संकटकाळी झुंजलो, जन्मभूमी तु, कर्मभूमी तू जेथे जातो तेथे, एकत्र आम्ही तुझ्या ठायी. महाराष्ट्रात जन्म घेतला आणि मराठी असल्याचा सार्थ अभिमान बाळगून छत्रपती
श्रीमंत शिवाजी महाराज यांना वंदन करून कोणत्याही प्रकारचे अलंकारिक शब्दांचा प्रयोग न करता अगदी मनापासून जे काही सुचेल ते लिहण्याचा एक प्रयत्न करतो आहे. झाकलेल्या मुठीतून वाळूचा कण निसटावा तसं हळूहळू आयुष्य निघून चाललंय…आणि,आपण उगीच भ्रमात आहोत कि आपण वर्षा-वर्षाने मोठे होत चाललोय. काळ बदलतो,वेळ बदलते,पात्र बदलतात आणि भूमिकाही बदलतात... बस मनगटात, स्वप्नांना जिवंत करण्याची, पंखात बळ निर्माण करण्याची, लाथ मारीन तिथे पाणी काढण्याची जिद्द व त्यासाठी अपार अविरत संघर्ष करण्याची तयारी ठेवावी लागते. स्वप्नं पहावीत आणि जरूर पहावीत त्याशिवाय ती पूर्ण करता येत नाहीत !!! स्वप्नं ही फुकटच असतात, फक्त ती पूर्ण करायला किंमत मोजावी लागते !!! आपली स्वप्नं पूर्ण झाली की जो आनंद येतो तो क्षण म्हणजेच स्वर्गीय सुखाचा आनंद असतो !!! मित्रांनो स्वप्नं पाहा आणि ती कृतीत आणण्यासाठी स्वतःवर विश्वास ठेवा आणि अतोनात प्रयत्न करा !!! यश हे फक्त आणि फक्त तुमचेच आहे !!!
“मैं ज़िन्दगी का साथ निभाता चला गया... हर फ़िक्र को धुएँ में उड़ाता चला गया”....हा असला काहीसा माझा आयुष्याचा दृष्टिकोन आहे....
माझे बाबा [ शहा काका ] आणि आई यांनी मला लहानपणापासून अगदी फुलासारखे जपून माझे संगोपन केले आणि मला मोठे केले.
मी वकील होई पर्यंत आणि आज पर्यंत खऱ्या अर्थाने आयुष्यात कष्ट काय असतात हे मी बघितलेच नाहीत. आज आयुष्यात मी जे काही आहे त्याचे सर्व श्रेय हे मी माझे आई बाबा यांना अर्पण करतो.
त्याचसोबत माझी पत्नी मैथिली हिने तिच्या शांत आणि मृदू स्वभावे खूप मोठ्यामनाने आजपर्यंत मला सांभाळून घेतले आहे.
अनेक प्रकारचे उद्योग मी करत असतो, त्यासाठी मला प्रेरणा हि घरातूनच मिळत असते. अनेक चुका आयुष्यात मी केल्या, पण माझे मित्र सदैव माझ्या पाठीशी सतत उभे राहिले म्हणून माझ्या सर्व मित्रांचे मनापासून आभार.
महाराष्ट्रात गेल्या पंधरा सोळा वर्षा पासून मी वकिली व्यवसाय करत असताना आलेले अनेक अनुभव त्याचबरोबर अनेक लोकांच्या संपर्कात आल्याने तसेच अनेक मित्रांच्या सहवासात राहून आलेले चांगले व वाईट अनुभव कुठेतरी लिहून ठेवण्याची इच्छा मनात आहे आणि त्या निमित्ताने आयुष्यावर बोलू काहीचा एक प्रयोग करण्याचा हा एक छोटासा प्रयत्न आहे.
प्रत्येकाला छान आयुष्य जगावसं वाटतं तसंच मला देखील वाटतं. ते आयुष्य छान जगण्याच्या प्रत्येकाच्या संकल्पना या थोड्या वेगवेगळे असतात. तशाच माझ्याही काही वेगळ्या आहेत. आपण आयुष्य जगत असताना आपल्याकडून जास्तीत जास्त मित्रांना आनंद कसा मिळेल याचा प्रयत्न मी नेहमीच करत आलो आहे.
सतत सर्व मित्रांसाठी काहीतरी करण्याची भावना माझ्या मनात असते आणि त्या दृष्टीने मी सदैव प्रयत्नशील असतो.
समाजात आणि व्यावहारिक आयुष्यात वावरतांना आपली नियत स्वच्छ असली आणि नाविन्यपूर्ण काही करण्याची आवड असली कि सारे काही सहज शक्य असते.
माझ्या बॉइस टाउन शाळेचे प्राचार्य श्री. बेजोन देसाई सर मला नेहमी म्हणायचे
- "स्काय इस द लिमिट माय बॉय, लिव्ह युअर ड्रीम्स". आयुष्यावर बोलू काही हा केवळ कोरोनाचे निम्मिताने घरात बसुन विरंगुळा म्हणून त्याचबरोबर माझी लेखनाची आवड जोपासण्याचा एक प्रयत्न आहे,त्याचसोबत आज दिनांक २४/०५/२०२० रोजी वयाचे ३९ वर्ष पूर्ण करून चाळीशीत पदार्पण करीत आहे त्यानिमित्ताने आयुष्यावर बोलू काहीचा हा माझा पहिला प्रयोग आहे.
ऋणनिर्देश..
कै.श्री.
मामा जोगळेकर.
कै.श्री.
सुहास काणे सर.
श्री.
चंदुलाल शहा. [ शहा काका
]
सौ.
योजिता शहा. [ आई
]
श्री.अविनाश भिडे सर.
श्री.
सुधीर मुतालिक सर.
सौ.
मैथिली सुयोग शहा.
चि.
अद्वैत सुयोग शहा.
अनुक्रम..
माझे दैवत छत्रपती श्रीमंत शिवाजी महाराज.
आठवणीतले मामा जोगळेकर.
शाळेतले व कॉलेज मधील मजेदार किस्से.
माझा वकिली क्षेत्रातील प्रवास.
माझी माती माझी माणस.
आयुष्यातील लक्षात राहणाऱ्या काही चुकांविषयी.
पर्यटन विषयी प्रेम व माहिती.
मला आवडणाऱ्या काही कविता.
माझ्या आयुष्यातील अविस्मरणीय भेटी....
- भारताचे सरन्यायाधीश श्री. शरद बोबडे साहेब यांच्या सोबत एक अविस्मरणीय दिवस.
- महाराष्ट्राचे मुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस यांचे सोबतचा संवाद.
- महाराष्ट्राचे मुख्यमंत्री श्री. उद्धव ठाकरे साहेब यांचे सोबतचा संवाद.
- महाराष्ट्राचे प्रख्यात पोलीस अधिकारी तसेच नाशिकचे पोलीस आयुक्त श्री. विश्वास नांगरे पाटील सर यांचे बरोबर संवाद आणि कौतुकाची थाप.
- विश्वविख्यात श्री. अमिताभ बच्चन यांचे सोबतची भेट.
- गेल्या ३५ वर्षापासून आदिवासी बांधवांना अविरतपणे रुग्णसेवा देणारे तसेच पद्मश्री पुरस्कार प्राप्त असलेले डॉ. रविंद्र कोल्हे यांच्या समवेत गप्पागोष्टी.
- आनंदवन येथील डॉ. आमटे यांचे सोबतचा एक संवाद.
- माझे कायदे विषयक पुस्तकाला बार कौन्सिल ऑफ महाराष्ट्र व गोवा यांचे मार्फत मान्यता मिळून बार कौन्सिल ऑफ महाराष्ट्र व गोवाचे ऑफिस मध्ये प्रकाशन सोहळा.
- गिनीस वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये माझ्या नावाची नोंद होणे हा देखील माझ्यासाठी एक अविस्मरणीय अनुभव आहे.
आयुष्यात प्रेरित करणारे काही पुस्तके-
१] दिसामाजी काहीतरी ते लिहावे – मामा जोगळेकर.
२] यु कॅन विन – शिव खेरा.
३] मन मे हैं विश्वास – विश्वास नांगरे पाटील.
४] छत्रपती श्रीमंत शिवाजी महाराज.
५] नेस्टिंग इन नेचर - आर्किटेक्ट श्री. संजय पाटील सर.
माझे दैवत – छत्रपती श्रीमंत शिवाजी महाराज.
छत्रपती श्रीमंत शिवाजी महाराज कि जय असे म्हंटले कि, सळसळून रक्त उसळून आलेच पाहिजे.
जो काही विश्वास आणि प्रेरणा या नावात मिळते तो काही वेगळाच आहे.
लहानपणापासून माझ्यावर छत्रपती शिवाजी महाराजांचा प्रचंड प्रभाव असून, राजा कसा असावा तर छत्रपती शिवाजी महाराजां सारखाच असावा हे पक्के झाले. शालेय जीवनात इतिहास या विषयात शिकलो तो शिवाजी महाराज यांचा इतिहास माझ्या साठी पुरेसा नव्हता.
छत्रपती शिवाजीराजे भोसले, मराठी साम्राज्याचे संस्थापक उत्कृष्ट योद्धा,
आदर्श शासनकर्ता, सर्वसमावेशक, सहिष्णू राजा म्हणून भारतीय आणि विशेषत्वाने महाराष्ट्रीय इतिहासावर महत्वपूर्ण ठसा उमटवला. मराठी साम्राज्याचे संस्थापक आणि एक आदर्श शासनकर्ता म्हणून ओळखले जाणारे छत्रपती शिवाजीराजे भोसले एक सर्व समावेशक,
सहिष्णू राजा म्हणून महाराष्ट्रात आणि इतरत्रही वंदिले जातात. शिवाजी महाराजांनी त्या अन्याय-अत्याचारातून जनतेची सुटका केली, आणि उत्तम शासनाचे एक उदाहरण भावी राज्यकर्त्यां समोर ठेवले.
छत्रपती शिवाजी महाराज एक उत्तम प्रशासक होते. त्यांचं व्यक्तिमत्व बहुआयामी होते.
महाराष्ट्रातील अनेक मावळ्यांना शिवाजी महाराजांनी प्रेरित केले.
शिवाजी महाराजां कडे उत्तम संघटन कौशल्य होते. श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराजांनी पाण्याच्या नियोजनाचे केलेले काम आजही प्रेरणादायी,
शिकण्यासारखे आहे.
महाराष्ट्राला समृद्ध असा ऐतिहासिक वारसा लाभला आहे.
अशा ऐतिहासिक वारसांमधून आपल्या महाराष्ट्राच्या पराक्रमाची, लढवय्या बाण्याची ओळख पटते. राज्याच्या कानाकोप-यात असलेले गड-किल्ले बघितले तर ही ओळख जास्त अधोरेखित होते. सह्याद्रीच्या अंगाखांद्यावर उभे राहिलेले गड असोत,
अथवा समुद्रकिनारी लाटांचा समर्थपणे सामना करत उभे असलेले हे गड-किल्ले असोत. ते आपल्या इतिहासाची साक्ष पटवून देतात.
वर्षानुवर्षे अंगावरऊन, पाऊस, वारा झेलत हे गड-किल्ले आजही सक्षमपणे उभे आहेत. ते सांगतात,
या मातीतील मराठय़ांच्या पराक्रमाच्या गाथा, छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांच्या मावळय़ांनी गाजवलेल्या पराक्रमाच्या गाथा..
मात्र काळाच्याओघात आता या ऐतिहासिक गड-किल्ल्यां पैकी काही गड-किल्ल्यांची पडझड सुरूआहे. या गड-किल्ल्यांचे संवर्धनआणि जतन करणे आता गरजेचे आहे व काळाची गरज आहे .
छत्रपती शिवाजी महाराजांच्या गड-किल्ल्यां बाबतच्या या कल्पना खरोखरच अद्वितीय म्हणाव्या लागतील. त्यांनी स्वराज्य स्थापनेसाठी जतन केलेला हा वारसा आता सांभाळण्याची,
त्याचे संवर्धन करण्याची जबाबदारी आपली व शासनाची आहे आणि तोच छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुजरा असेल !!!
छत्रपती शिवाजी महाराजांचाच मी एक मावळा आहे असे आज ही समजतो आणि आयुष्य हे निर्भीडपणे जगतो.
!!! जय भवानी जय शिवाजी !!! जय महाराष्ट्र !!
आठवणीतले मामा जोगळेकर
कै. मामा जोगळेकर हे नाव नाशिक करांसाठी अजिबात नवीन नाही. कै. मामा जोगळेकरांचे नाशिक करिता जे योगदान आहे ते खूप मोलाचे आहे. संपूर्ण महाराष्ट्रातून नाशिक शहरात गुंतवणूक करण्यासाठी मामा जोगळेकर हे एक विश्वसनीय नाव म्हणून मामांची ओळख होती.
कै.मामा साहेबांनी सचोटीने व विश्वासाने जो वटवृक्ष उभा केला त्याला जोड होती ती मेहनतीची आणि सामाजिक भान ठेवून सत्कार्य करण्याची.सदैव कष्ट सहन करून कोणत्याही फळाची अपेक्षा न करता कै.मामा जोगळेकर यांनी त्यांच्या सामाजिक कार्यातून एक आदर्श समाजा पुढे उभा केला आहे. कै.मामा जोगळेकर यांनी सदैव निरागसपणे चंदनासारखे या समाजाच्या कल्याणासाठी सर्वसामान्य माणूस व त्याच्या जिव्हाळ्याच्या विषयांसाठी काम केले. राष्ट्रीय सयंसेवक संघाचे सयंसेवक म्हणून कै. मामा जोगळेकर यांनी अनेक वर्ष काम केले. सार्वजनिक निवडणुकांमध्ये मामा यांचे मोलाचे योगदान असायचे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ,जनसंघ परिवार व भारतीय जनता पार्टीचे सक्रिय सदस्य तसेच आजीवन कार्यकर्ता म्हणून कै. मामा जोगळेकर यांची ओळख संपूर्ण नाशिक जिल्ह्याला होती. अनेक सामाजिक संस्था यांच्यासाठी काम करत असतांना मामा यांना कार्यकर्ता म्हणून काम करीत असतांना जे सुख आणि समाधान प्राप्त व्हायचे ते मी जवळून लहानपणापासून बघत आलो आहे. मामा या शब्दात दोनदा मा-मा असा उच्चार होतो त्यामुळे मा म्हणजे (आई ) त्याप्रमाणेच मामा यांनी सदैव सर्वांवर खूप खूप प्रेम केले.
बाबा,मामा यांच्या सोबत काम करीत असल्यामुळे लहानपणापासूनच मामा यांच्या घरी जाण्याचा योग नेहमीच असायचा. मामांच्या घरी जाण्याचे मुख्य आकर्षण म्हणजे त्यांच्या घराच्या बागेत असलेला झोपाळा आणि श्रीखंडाच्या गोळ्या.असे कधीच नाही झाले कि मामा यांच्या घरी गेलो आणि खाऊ मिळाला नाही.
लहानपणापासून ते कॉलेज आणि त्यानंतर वकील झाल्यानंतर मामा असेपर्यंत श्रीखंडाच्या गोळ्या कधी विकत घेऊन नाही खाल्या. अलीकडे अद्वैत साठी कोकणातून श्रीखंडाच्या गोळ्या आणल्यातर त्यानी सुद्धा मामा आजोबांची आठवण काढली.
अनेकवेळेस मामांकडून नवीन नवीन गोष्टी,नवीन पुस्तकांविषयी माहिती आणि बरेचसे ज्ञान प्राप्त व्हायचे.
मामा म्हणजे जबरदस्त व्यक्तिमत्व. मामांचे शिक्षण त्याकाळचे इंटरसायन्स असले तरी वाचनाची प्रचंड आवड असल्यामुळे मराठी व इंग्रजीवर छान प्रभुत्व होते.
शालेय शिक्षणा पासून वकिलीच्या व्यवसायात वकिली सुरु केल्यानंतर मामा हेच आमचे श्रद्धास्थान होते व आजही आहेत. कै.मामा जोगळेकर यांच्या कडून जे काही समाजसेवेचे कार्य शिकलो आहे त्याचे प्रत्येक क्षणा क्षणालाआठवण होत असते आणि प्रत्येक क्षणाला मामा यांच्या विषयी आदर अधिक पणे वाढत आहे.
मामांच्या विचारांनी प्रेरित होऊन आपल्या या समाजाला आपण काहीतरी देणे लागतो आणि आपण आपले कार्य सदैव हसतमुखाने करीत राहावे.आपल्या व्यवसायाचे व्यतिरिक्त आपण अनेक सामाजिक कार्यांमधुन आपला सहभाग नोंदवू शकतो आणि त्याकरिता कोणत्याही पदाची आवश्यकता नसते हे आम्ही मामा यांच्याकडून शिकलो. आज कोरोनाचे महाभयंकर प्रलयापासून आपण सर्व लढत असतांना मामा यांच्याकडून जे काही समाजसेवेचे कार्य शिकलो आहे त्याचे प्रत्येक क्षणा क्षणाला आठवण होत असते.
आज मामा आपल्यात असते तर त्यांची समाजाला किती मदत झाली असती असे अनेक वेळेस वाटत असते. निस्वार्थपणे समाजाला काही तरी देण्यासाठी तुमच्याकडे जिगर असावे लागते आणि अश्या वेळी राहून राहून पुन्हा मामा जोगळेकर यांची खूप आठवण होते. तात्पर्य इतकेच कि,आज आपल्या समाजात खूप काम आहे करण्यासारखे, मामा यांच्या विचारांनी प्रेरित होऊन, कार्यकर्ता म्हणून काम करण्यात खूप खूप सुख आणि समाधान मिळते. आज लोकांना आपली गरज आहे आणि आपण आपली आणि कुटुंबाची काळजी घेतली तर थोडे सामाजिक काम करू शकतो. आपल्याला जितके शक्य होईल तितके आपण सर्वांनी प्रयत्न नक्कीच केले पाहिजेत. आजही मी मामांच्या विचारांनी प्रेरित होऊन माझे आयुष्य जगण्याचा प्रयत्न करीत आहे आणि त्यात मला खूप खूप आनंद आणि समाधान देखील प्राप्त होत आहे.
शाळेतले व कॉलेज मधील मजेदार किस्से.
जिंदगी दोस्तो से नापी जाती हैं....तरक्की दुश्मानो से...
शाळा सोडून साधारण
पणे २५ वर्ष झालेत पण काही गमती जमती अजूनही लक्षात आहेत. शाळेतले उनाड मित्र,मैत्रिणी
अजूनही लक्षात आहेत आणि विशेष करून संपर्कातही. व्यवसायाचे निम्मिताने अनेक मित्र देशाचे
वेगवेगळ्या शहरांमध्ये आहेत तर काही परदेशात देखील आहेत. शाळेतले शिक्षक, त्यांच्या
हातचा मार फार कमी लोकांनी खाल्ला असेल पण त्याबाबतीत मी खूप भाग्यवान आहे कारण मी
तर त्यांचा हक्काचा गिर्हाईक होतोच. लहानपणी शिक्षा म्हणून सर्वात खोडकर मुलाला वर्षभर
वर्गातल्या मुली सोबत एकाच बाकावर बसवायचे आणि मग काय इतर मित्रच नाही तर संपूर्ण वर्ग हसायचा. आपली
[आदरार्थी बहुवचन] दर वर्षाची शिक्षा फिक्स होती आणि मैत्रीण देखील फिक्स होती. शाळेत
मिळणारी शिक्षा ही कॉलेज मध्ये गेल्यावर कित्ती छान असते हे कळले. आमचे हिंदी चे मास्तर
काळे सर, मी गप्पा मारतो म्हणून नेहमी माझ्यावर रागवायचे आणि दहावी पर्यंत माझे एकाच
उत्तर फिक्स होते, मी कुठे बोलतो आहे, शेजारचा मित्रच माझ्याशी गप्पा मारतो आहे. न आवडणाऱ्या
वर्गात सु-सु करण्याचे निम्मिताने संपूर्ण शाळा एक तास भर भटकायची आणि पकडलो गेलो कि
करंगळी दाखवायची आणि कसे फसवले याचा आनंद व्हायचे. अनेक वर्ष बेडूक झालो, खडू चा मार
खाल्ला, बाकावर उभे राहून झाले.... आता या सर्व खोड्यांची आणि मस्तीची तक्रार अद्वैतच्या
शाळेतून अद्वैतच्या बाबतीत येते तेव्हा मैथिलीला खूप राग येतो आणि मला खूप आनंद वाटतो.
मनापासून वाटते पोरगा प्रगती करतोय आहे आपला.... अनेक शिक्षकांच्या हातचा मार खाऊन
देखील तेव्हाही आणि आजही मी माझ्या सर्व शिक्षकांचा लाडका अति उत्साही विध्यार्थी होतो.
शाळा संपली आणि कॉलेज मध्ये जाण्याची वेळ आली तेव्हा कोणताही
वशिला नव्हता आणि मार्क कमी असल्यामुळे भोंसला मिलिटरी कॉलेज मध्ये मना विरुद्ध प्रवेश
घ्यावा लागला आणि सुरु झाली खऱ्या अर्थाने नवीन शिकण्याची,नवीन मित्र, नवीन अनुभव आणि
त्याच खोडकर स्वभामुळे शाळेची पुढील आवृत्ती म्हणून शिक्षकांच्या तक्रारी आणि ओरडणे.
सुधारून कोणाचे भले झाले असा आपला स्वभाव होता. नवीन झालेले मित्र यांच्या सोबत टवाळकी
आणि मस्ती परत सुरु झाली. एकदा तर यु. वाय. कुलकर्णी सरांनी भर कॉलेज मध्ये जाम बडवले
आणि रस्टीकेट तर जवळ जवळ झालोच होतो. पण नशीब चांगले आणि वेळेत माफी मागितली म्हणून टिकलो कॉलेज मध्ये. त्याच कॉलेज मध्ये या वर्षी प्रमुख पाहुणा म्हणून, कॉलेज मध्ये शिकत असलेल्या विध्यार्थ्यांना
मार्गदर्शन करण्याची संधी माझ्याच यु. वाय. कुलकर्णी सरांनी मला दिली. १९९६ चा कॉलेज
ते -२०२० पर्यंतचा प्रवास म्हणजे माझ्यासाठी एक मोठी पर्वणी होती, स्वतःला सिद्ध करण्याची.
कॉलेज मधले मित्र, मैत्रिणी, कट्टा, कॉलेजच्या राम मंदिरा बाहेरील आठवणी आणि धमाल यांची
खूप आठवण येते. आजही दरवर्षी रामनवमीचे दिवशी आम्ही काही मित्र आठवणीने परिवारा सोबत
भोसला कॉलेजच्या राम मंदिरात दर्शनासाठी जातो. आपल्या आयुष्यातला एक सुपरहिट फॉर्मुला
तुम्हाला सांगतो "ज़िन्दगी को हमेशा मुस्कुरा के गुजारो"……!!
ग्रॅड्युएशन भोंसला मिलिटरी मधून पूर्ण केले आणि सुरु झाला
तो एन.बी.टी लॉ-कॉलेज चा प्रवास..... या वेळी मात्र मी खूप प्रामाणिकपणे फोकस्ड होतो
आणि तेही आयुष्यात शिक्षणाचे बाबतीत तर पहिल्यांदाच. सर्व लेक्चर मनापासून प्रथम बाकावर
हजर राहून ऐकत होतो. लॉ- कॉलेज ला ऍडमिशन घेतली आणि ओळख झाली ती लॉ- कॉलेज चे माजी
प्राचार्य काणे सरांशी. काणे सरांविषयी मी पुढे सांगणारच आहे. नवीन मित्र आणि नवीन
मैत्रिणी झाल्या. आयुष्यात कँटीन चे आयुष्य लॉ-कॉलेज मध्ये आल्यामुळे अनुभवायला मिळाले.
किशोर शेठच्या कँटीन मध्ये १ मिसळ आणि १२ पाव हि संकल्पना कळली आणि दुनियादारी सुद्धा.
कट्टयावर अभ्यंकर चे रोजचे नवीन नवीन जोक ऐकून पोट धरून धरून हसायचो. अभ्या अभ्यंकर
ने लॉ चे शिक्षण पूर्ण केले नाही ते वेगळेच पण आम्हाला हसवून, हसवून साफ वेडे मात्र
केले. सम्पुर्ण आयुष्यात लक्षात राहणारी लॉ-कॉलेज मधली आठवण म्हणजे फर्स्ट इयर चा पहिला
पेपर...... अरे देवा प्रचंड अभ्यास करून खूप मेहनत घेऊन परीक्षेला गेलो आणि पहिला पेपर
म्हणजे गुगली वर गुगली.... विषय पूर्ण माहित होता, तयारी पण पूर्ण होती मात्र प्रश्नपत्रिकेत
विचारलेले प्रश्न काहीसे उमजेनासे झाले. काहीच कळत नव्हते हे काय प्रश्न आहेत ते....
तर्क शास्त्राप्रमाणे उत्तर लिहून घरी आलो आणि साफ निराश झालो होतो. बाबांना म्हणालो
कि मला लॉ करायचे नाही...बस विषय संपला.... वर्ष भर अभ्यास करून देखील एकही प्रश्न
समजले नाही असे कुठे असते का ? माझा सर्व त्रागा करून झाल्यावर रात्री बाबांनी मला
सांगितले अभ्यास पुरे आता फक्त मज्जा म्हणून परीक्षेला अपिअर तरी हो. इच्छा झाली तर
पेपर लिही,किमान ४ प्रश्नांची उत्तरे जी तुला आवडतील,जे तुला आवडेल, सुचेल ते लिही
पण लिही, हवे तर आवडत्या पिक्चर ची ( शोले ) ची स्टोरी लिहून घरी ये. मी जाम खूष झालो आपल्याला लॉ झेपत
नाही हे मला आणि बाबांच्या लक्षात आले होते आणि माझे काम झाले होते. त्यादिवशी जे पुस्तक
टाकले ते शेवटच्या पेपरपर्यंत उघडले नाही. नियमित पणे पेपर ला जायचो, मोजून ४ प्रश्नांची
म्हणजे १६ मार्कांचा एक प्रश्न असे एकूण ६४
मार्कांचे पेपर मधील उत्तरे लिहायचो आणि घरी परत यायचो,बाबा पण खूष आणि मी पण. पहिल्या
वर्षाचे सर्व पेपर मी याच पद्धतीने दिलेत आणि निकालाची तर अजिबात चिंता नव्हती पण निकाल
खूप धक्कादायक होता. एकूण आमच्या पहिल्या वर्षातील ३७० मुलां पैकी फक्त १७ विध्यार्थी
सर्व विषयांमध्ये पास झालेत आणि मी त्यातला एक होतो..... ( शोले पिक्चर ची स्टोरी नक्कीच लिहली नव्हती मी.)
प्रश्न चिन्ह पडला माझ्या समोर आता पुढे काय ? माझ्या
प्रश्नाचे उत्तर बाबांनी हसून स्वागत करून दिले आणि ते मला माझ्या काणे सरांनी समजावून
सांगितले. कायद्याचा अभ्यास कसा करायचा आणि त्याची तयारी कशी करायची हे त्यांनी मला
शिकवले.
लॉ कॉलेज मध्ये आणि लॉ कॉलेज च्या मित्रांमध्ये तो पर्यंत माझा भाव सॉलिड वाढला होतो. सर्व मित्र आणि मैत्रिणीं मध्ये मी लगेच स्कॉलर म्हणून फेमस
ही झालो. मुरकुटे लायब्ररी मध्ये सुहास बरोबरच केलेला अभ्यास आणि धम्माल आठवते. अशातच
ओळख झाली ती गौरी जोशी नावाच्या मैत्रिणीशी. टिपिकल ब्राम्हण (शिक्षक किंवा प्रिन्सिपॉल
मॅडम टाइप), रोख ठोक आणि अति स्पष्ट स्वभाव. आमची मैत्री छान जमली कारण माझे कान टोचणारे
लोक मला आवडतात. सुहास, मी आणि गौरी आज ही खूप छान मित्र
आहोत. आजही अनेक विषयांवर मी गौरी आणि सुहास चे मार्गदर्शन घेत असतो. गौरीच्या मार्गदर्शनामुळे
लॉ कॉलेजमध्ये फायनल इयर मध्ये मी कॉलेज मध्ये पहिला देखील आलो आणि सत्कार देखील स्वीकारला.
त्या दिवशी त्या सत्कार समारंभात आई बाबांचे डोळे भरून आले होते आणि अभिमान दिसत होता
तो काणे सरांच्या चेहऱ्यावर. मनापासून खूष होते सर्व आणि मी सुद्धा सॉलिड खूष होतो.
लॉ कॉलेज ची अजून मोठी आठवण म्हणजे आमचे प्राचार्य सैनिक
सर आणि त्यांच्या मुळे शक्य झालेली दिल्ली ट्रिप. एन.बी.टी लॉ-कॉलेज मध्ये शिकण्याच्या सर्वात मोठा फायदा म्हणजे एकतर ते कॉलेज-रोड
वर आहे. भरपूर हिरवळ आहे कॅम्पस मध्ये, कारण शेजारी बी.वाय. के, एच. पी. टी आणि एस.
एम. आर. के कॉलेज ची सुंदर हिरवळ आहे. आमच्या कॉलेज ची दिल्ली ट्रिप सॉलिड हिट आहे.
आज याच माझ्या एन.बी.टी लॉ कॉलेज मध्ये मी अनेक विध्यार्थ्यांना अनेक विषयांवर शिकवायला
जात असतो आणि प्रेत्येक वेळेस कॉलेज मध्ये गेल्यावर सर्व जुन्या आठवणी डोळ्यासमोर येऊन
झूप झूप करून जातात.
शाळा आणि कॉलेज जीवना
विषयी थोडक्यात सांगायचे झाले तर….. कल न हम होंगे न कोई गिला होगा,सिर्फ सिमटी हुई यादों का सिलसिला सा होगा, जो लम्हे हैं चलो हँसकर बितालें, जाने कल जिंदगी का क्या
फैसला होगा।
माझा वकिली क्षेत्रातील प्रवास.
माझा वकिली क्षेत्रातील प्रवास – लॉ-कॉलेज चे शिक्षण पूर्ण झाले आणि शेवटचा पेपर टाकून घरी आलो ते बाबांना म्हणालो उद्यापासून कोर्टात जायचे आहे. कुठल्या प्रकारची प्रॅक्टिस करावी असे तुम्हाला वाटते म्हणजे सिव्हिल की क्रिमिनल ची प्रॅक्टिस ? बाबांचे पहिले उत्तर म्हणजे आधी वकील तर हो मग बघू पुढे काय करायचे ते....
कोर्टाचा पहिला दिवस संपूर्ण कोर्टात भटकून रात्री घरी आलो तेव्हा लक्षात आले की कॉलेज मध्ये जे शिकलो ते आणि प्रत्यक्षात खूप जमीन आस्मानाचे अंतर आहे. आपण चांगल्या सिनियर कडे गेलो तर आपल्या आयुष्याचे कल्याण होणार आणि काही तरी शिकायला मिळणार.
सुरुवातीला लॉ-कॉलेज मध्ये शिकत असतांना भिडे सर आणि जायभावे सर हे परिचित होते. कारण ते नेहमी वेग-वेगळ्या कार्यक्रमातून कॉलेज मध्ये आम्हाला काही मार्गदर्शन करीत असत आणि दोघेही मोठे यशस्वी वकील असल्याने त्यांची ख्याती होती व आजही आहे. सुरुवातीला जायभावे सर यांच्या ऑफिस मध्ये जुनिअरशिप साठी अनेक चकरा मारल्या परंतु त्यांच्या बाळू नावाच्या टायपिस्ट ने जायभावे सरांना कधी भेटूच दिले नाही. रोज २ तास बसवून ठेवायचा आणि परत पाठवायचा. याने थोड्या प्रमाणात फ्रस्ट्रेशन देखील आले होते पण जिद्द सोडली नव्हती. त्यानंतर कोर्टाची पायरी चढलो आणि भिडे सरांचे कोर्टात युक्तिवाद ऐकला आणि खूप जास्त प्रभावित झालो. कॉलेज मध्ये असतांना भिडे सर आम्हाला नेहमी शिकवायला येत असत. बाबांना म्हणालो वकिली करेनं तर भिडे सरांबरोबर फौजदारीची वकिली करेन नाही तर वकिली करणार नाही. पटकन टोकाची भूमिका घेणे हा माझा स्वभाव होता. बाबांनी फार विचारपूर्वक भिडे सरांना फोन केला आणि म्हणाले मुलाने वकिली करेन तर तुमच्या सोबत करेन नाही तर करणार नाही असे म्हंटले आहे काय करू असा प्रश्न विचारला ? भिडे सर म्हणाले असा कोण आहे माझा विध्यार्थी मला त्याला भेटचे आहे, पाठवा त्याला माझ्याकडे. बाबांनी फोन ठेवला आणि पुढच्या अर्ध्या तासात मी भिडे सरांसमोर होतो. सरांनी मला अनेक वेळेस त्यांच्या लेकचर मध्ये बघितले होते पण शहा काकांचा मुलगा म्हणून ती माझी पहिली ओळख होती. कालच परीक्षा संपली आहे आता थोडी मज्जा कर आणि निकाल लागला की ये म बघू असे म्हणाले. सरांना म्हणालो नाही सर मी आजपासूनच येणार आहे,खूप मज्जा करून झाली. सरांनी थोडा विचार करून सांगितले - हे बघ मी तुला शहा काकांचा मुलगा म्हणून ऑफिस ला येण्याची परवानगी देतो पण बाहेरच्या बाकड्यावर बसावे लागेल कारण ऑफिस मधल्या जुनिअर वकिलांना बसायला जागा कमी पडते आहे. अश्या रितेने सुरुवात झाली माझ्या वकिलीच्या क्षेत्राची. सकाळी ८.३० ते रात्री ८.३० -९ हे माझे रोजचे नित्यक्रम झाले. माझे व्यवसायातील पहिले गुरु म्हणजे आमचे सर्वांचे लाडके जाधव काका. अर्ज-फाटे कशे लिहायचे आणि कुठल्या कोर्टात कसे काम चालते, त्याचबरोबर संपूर्ण कोर्टाची घटना आणि रचना मला समजावून सांगणारे ते जाधव काका. प्रत्येक खटल्याची अचूक माहिती, पक्षकाराची माहिती, खटल्याचा निकाल, हा जाधव काकांच्या तोंडी पाठ. प्रचंड हुशार आमचे जाधव काका. फक्त डिग्री नाही तर अपिलात सुद्धा युक्तिवाद करायला कमी पडणार नाही ते डी.जे कडे असे आम्ही नेहमी म्हणायचो.
माझा पहिला कोर्टातील अर्ज ऑफिस मध्ये बघितल्यानंतर भिडे सरांचे सर्व त्यावेळचे जुनिअर व माझे सहकारी आणि जाधव काका माझे अक्षर चांगले असल्याने सर्व अर्ज माझ्याकडूनच लिहून घेत असत आणि मला देखील खूप मज्जा येत असत. माझे त्यावेळचे सिनियर म्हणजे महेश पाटील सर ज्यांच्या बरोबर थांबुन त्यांना अस्सीस्ट करायचे असे मला भिडे सरांनी सांगितले होते. एखादी गोष्ट सांगितली आणि ती पटली कि त्याचे तंतोतंत पालन करायचे हा माझा स्वभाव. प्रामाणिकपणे जे हि काम मिळत असे, जो ही कोणी सांगत असे ते मी १००% कुठलाही कंटाळा न करता करीत असे. अक्षर चांगले आणि लिखाणाचा स्पीड चांगला असल्याने अनेक वेळेस डिक्टटेशन ची संधी मिळू लागली आणि त्याचबरोबर सर पक्षकाराकडून माहिती घेत असत त्यावेळेस त्या केस विषयी बराचसा तपशील माहित होत असत. प्रत्येक वेळेस सरांबरोबर प्रेत्येक केस ची तयारी म्हणून स्पॉट बघण्याची संधी प्राप्त होत असे. सर रोज नियमितपणे सर्व केसचा आढावा सर्व जुनिअर कडून घेत असत आणि दुसऱ्या दिवसाच्या कामाकरिता मार्गदर्शन करीत असत. ऑफिस मध्ये काय, कसे काम करायचे तो तपशील जाधव काकांकडून शिकलो आणि त्याच बरोबर माझे त्यावेळचे सहकारी महेश पाटील सर, मंदार भानोसे, परीक्षित पटवर्धन, यशोदीप वाघ हे माझे चांगले मित्र सुद्धा झाले. प्रेत्येकाची काम करण्याची एक वेगळीच शैली होती आणि आहे. भिडे सर हे नाशिक जिल्ह्यातीलच नाही तर संपूर्ण महाराष्ट्रात फौजदारी क्षेत्रातील एक मोठे नाव असल्याने आम्हाला प्रेत्येक कोर्टात आदरपूर्वक वागणुक मिळत असे आणि कोर्ट डेकोरंम कसे ठेवायचे याचे मार्गदर्शन सरांकडून वेळोवेळी मिळत असे. महत्वाचे म्हणजे जज साहेबांची भिडे साहेबांचे जुनिअर म्हणून खूप अपेक्षा असायच्यात आमच्याकडून. भिडे साहेबांचे जुनिअर आहेत ना मग ब्रिफ चा अभ्यास करून आले असाल हा पक्का समज. अनेक वेळेस ते केस चालवण्याचा आग्रह धरत असत आणि काही चुकलेच तर मी भिडे साहेबांकडून उर्वरित माहित घेईन असे देखील सांगून आम्हाला प्रोत्साहित करीत असत. भिडे सरांच्या ऑफिस मध्ये जितके एक्सपोजर नवीन वकिलांना मिळते,केस चालवण्याची संधी प्राप्त होते आणि त्याच बरोबर जितके मार्गदर्शन मिळते ते फार कमी ऑफिस मध्ये पाहायला मिळते. सरांनी ऑफिस मध्ये बसायला जागा नाही हे मिश्कीलपणे जरी म्हंटले होते पण कधीच बाहेर बसायला नाही लागले. सर्व सहकाऱ्यांनी त्यांच्यात जागा दिली आणि मी त्यांच्या मनात माझी जागा निर्माण केली. आज हि मी माझ्या प्रॅक्टिस मध्ये असलेली कोणतीही अडचण घेऊन सरांकडे गेलो किंवा माझ्या सहकाऱ्यांकडे गेलो कि मला योग्य ते मार्गदर्शन मिळत असते. भिडे सरांबरोबर २ वर्ष त्यांचा जुनिअर म्हणून काम करीत असतांना सतत त्यांच्या सावली सारखा त्यांचे सोबत असायचो आणि जास्ती जास्त सरांकडून शिकण्याचा प्रयत्न करीत असायचो. या दोन वर्षाच्या कार्यकाळात सरांनी मला अनेक वेळेस माझ्या बाबांची प्रक्टिस आणि प्रॉपर्टी चे क्षेत्रात वकिली करण्यास प्रोत्साहित केले पण मला काही करून प्रॉपर्टीचे क्षेत्रात आणि बाबांची असलेली कन्वेयंसिन्ग ची प्रॅक्टिस अजिबात करायची नव्हती. दोन वर्षानंतर ज्या माझ्या बाबांच्या एका शब्दावर सरांनी मला त्यांच्या ऑफिस मध्ये ठेवून काम शिकण्याची आणि करण्याची संधी दिली होती ते माझ्या सोबत सरांकडे त्यांच्या घरी आले आणि मी स्वतंत्र प्रॅक्टिस करू इच्चीतो हे सांगून सरांची परवानगी घेतली. खूप आनंदाचा क्षण होता तो माझ्यासाठी आणि सरांसाठी देखील कारण त्यांनी मला अनेक वेळेस यासाठी प्रोत्साहित देखल केले होते. तो दिवस आहे आणि आजचा दिवस आहे मी आज जे काही थोडे फार नाव आणि यश माझ्या क्षेत्रात तयार केले आहे त्यात काणे सरांचा, बाबांचा आणि भिडे सरांचा देखील खूप मोठा वाटा आहे. त्यांच्या या ऋणातून मी कधीही मुक्त होऊ इच्छित नाही आणि म्हणूनच मला आज १६ वर्षांपासून भिडे सरांचे कोणतेही काम पहिल्या पसंतीने आणि आवडीने करायला मनापासून आवडते. भिडे सरांचे बार कौन्सिल चे इलेक्शन असो किंवा बार कौन्सिल चे अध्यक्षपद असो त्यासाठी आम्ही सर्वांनी मिळून एकत्रपणे संपूर्ण महाराष्ट्र आत्तापर्यंत ३ वेळेस पिंजून काढला आहे आणि ते करत असतांना कधीही उत्साह कमी पडलेला नाही. नुकतेच २०२० मध्ये भिडे सरांचे बार कौन्सिल चे अध्यक्षपदाचे कार्यकाळात ऐतिहासिक अशी राज्यव्यापी वकिलांची परिषदचे नियोजन करण्यात आले आणि भारताचे १३५ वर्षांचे इतिहासात पहिल्यांदा भारताचे सरन्यायाधीश श्री. शरद बोबडे साहेब नाशिकला आले. या राजव्यापी वकिलांची परिषदचे नियोजन समिती तसेच अनेक महत्वाच्या जवाबदाऱ्या मी, तन, मन आणि धन याने यशस्वीपाने पार पाडण्यात माझे योगदान दिले आणि त्याचे खूप छान पणे मला गौरवण्यात देखील आले. प्रचंड मेहनत घेतली आणि हि राजव्यापी वकिलांची परिषदचे कार्यामध्ये स्वतःला संपूर्ण पणे झोकून घेतले.
आजही मी भिडे सरांबरोबर अनेक कार्यांमध्ये सक्रिय असतो त्यांच्या घरातील एक सदस्य म्हणून माझी छोटीशी ओळख देखील आहे. आज मी जी काही माझी छोटीशी प्रॅक्टिस प्रॉपर्टी व रेजिस्ट्रेशन चे क्षेत्रात करीत आहे त्याची मनापासून इचछा कधीच नव्हती, पण एक सवय मला छान आहे आणि ती म्हणजे जे काही करायचे ते अगदी मनापासून करायचे आणि त्यासाठी आपले ११०% योगदान द्यायचे. अनेक ठिकाणी मी भिडे सरांबरोबर असतांना ते माझी ज्याप्रकारे ओळख करून देतात ते दोन प्रेमाचे शब्द खूप छान असतात. वकिली व्यवसायात किती यश मिळाले हे मी सांगण्यापेक्षा आज पर्यंत जे काही काम केले ते प्रामाणिकपणे केले आणि कोणाला देखील आजपर्यंत फसवले नाही आणि लुबाडले नाही याचे बद्दल अभिमान आहे. आपण आपल्या व्यवसायाशी प्रामाणिक राहिलो तर देव कधीच कामाची कमी पडू देत नाही असे मामा आणि बाबा अनेक वेळेस सांगत असत. व्यवसायात प्रामाणिकपणे काम करून चांगले नाव आणि प्रतिष्ठा कमावता येते हे देखील मी या सर्वांकडून शिकलो आहे आणि त्याचीच प्रचिती मला रोज माझ्या दैनंदिन आयुष्यात येत असते.
वकील म्हणून थोडीशी गम्मत –
जिथे माणूस आहे, तिथे चुका आहेत....
जिथे चुका आहेत, तिथे गुन्हा आहे...
जिथे गुन्हा आहे, तिथे कायदा आहे....
जिथे कायदा आहे, तिथे पळ वाटा आहे...
जिथे पळवाटा आहे, तिथे मी उभा आहे....
तारीख पर तारीख,तारीख पर तारीख, तारीख पर तारीख मिलती रही हैं...लेकीन इंसाफ नही मिला माय लॉर्ड, इंसाफ नही मिला... मिली हैं तो सिर्फ ये तारिक...
"आम्ही वकील आहोत आमच्या ही भावना असतात प्रयत्न करतो आहे बघा आवडते आहे का" - सुयोग..
कोण म्हणतं वकील देतो
तारीख पे तारीख
तारीख मिळण्यामागे
कारण असते बारीक...
कोर्टातले जजसाहेब
आले नाही कोर्टात
त्यालासुद्धा कारणीभूत
वकिलाला ठरवितात...
वकील नावाचा माणूस
लय जाम भारी
अडचणीच्या वेळी
तो पाठी उभा राही...
गुन्हा करून कोणी आला
सगळ्यांची दारे बंद होई
एकट्या वकिलांचे दार
त्याच्यासाठी उघडे राही...
अन्याविरुद्ध लढण्याची
ताकत ठेवतो आम्ही
अंगावर आला कोणी तर
शिंगावर घेतो आम्ही...
वकिलाने आत्महत्या
केल्याचे ऐकलंय तुम्ही
मोबदला मिळो न मिळो
शानमध्ये राहतो आम्ही...
सगळेच म्हणतात
डॉक्टर आणि कोर्टाची
चढायची नाही पायरी
आयुष्यातील संकटांना
सामोरे जाण्याची तीच
तर असते खरी तयारी...
स्वातंत्र्य लढ्यातला
चौथा खांब आम्ही
नाहक आम्हाला दुषणे
देत नका राहू तुम्ही...
वकिलाने केस जिंकली
तर त्याची वाहव्वा करता
पण तोच जर हरला तर
त्याची बदनामी करता?
आम्हीपण आहोत ना ?
तुमच्या सारखीच माणसं
तारीख देणं हा तर एक
कोर्ट कामकाजाचा भाग
त्यामुळे का लावता तुम्ही?
आम्हां वकिलांवर डाग...
म्हणूनच तारीख पे तारीख
देण्याचा आमचा नाही छंद
त्यासाठी कायद्यात व्हावी
सुधारणा मग तारीखच
मिळण्याची होईल बंद...
समस्त वकिलांच्या भावना व्यक्त करण्यासाठी केलेला एक मजेशीर प्रयत्न !!!
वकील म्हणजे वकील म्हणजे वकील असतो !!!
वकील म्हणजे वकील म्हणजे वकील असतो. कधी वकील तर कधी वकील साहेब असतात. आपल्या समाजात वकिलानं विषयी अनेक भावना, प्रतिक्रिया लोक आपापल्या पद्धतीने मांडत असतात. एखाद्या कामाचा निर्णय आपल्या बाजूने लागला तर पक्षकार लगेच वकील साहेब खूप हुशार आहेत आणि तेच काम काही कारणाने अथवा गुणवत्तेच्या जोरावर झाले नाही किंवा निकाल आपल्या बाजूने लागला नाही तर लागेच नाव ठेवायची.
अहो वकील सुद्धा आपल्या सारखा एक माणूसच आहे कि, अनेक वेळेस वकील चिडचिड करतात, रागावतात, वेळेवर उपलब्ध नसतात, उशीर करतात, स्वतः फोन करत नाहीत, अनेकदा फोन उचलत नाहीत.... अशा प्रकारच्या अनेक तक्रारी पक्षकार करतात, करत असतात...
अहो पण कोणी लक्षात घेत नाही की, ते अनेक पक्षकारान्च्या बिनडोक प्रश्नांनी वैतागलेले असतात, एका बाजूला संथ न्यायालयीन व्यवस्था, एका बाजूला घाई करणारे अशील, ही जीवघेणी सर्कस वकील म्हणूनच सहन करतात,त्या ठिकाणी पक्षकार असते तर कधीच पळून गेले असते अशी स्थिती असते.
अहो एक काम पुर्ण करण्यासाठी 1760 कागदपत्रांची लक्षपूर्वक पुर्तता करावी लागते जी अनेकदा पक्षकार वेळेवर व्यवस्थित देत नसतात , एक काम झाले की दुसरे उभेच असते, मागे तिसरे-चौथे मोठी रांग असते, शिपाया पासून भाउसाहेबां पर्यंत सर्वांचे स्वभाव संभाळावे लागतात. त्यात वकीलाला देखील स्वतःचा संसार असतो तुमच्या सारखीच सासुरवाडी असते, जबाबदार्या असतात, तोहि आजारी पडू शकतो.....
अरे तो पण तुमच्या सारखाच माणूस असतो कि...
पण त्याच्या वर असंख्य जबाबदाऱ्या आणि अपेक्षांचे ओझे असते, असंख्य येणाऱ्या फोन मधून त्याला स्वतःच्या मुलाबाळांना फोन करायला देखील वेळ मिळत नाही तो क्लाएंटला कधी फोन करणार ?
अनेक वेळा तर कामाची फी हि काम पूर्ण झाल्यावर देतो, आणून देतो, मुलीचे लग्न झाल्यावर देतो, कर्ज मंजूर झाले कि देतो, आणि काय तर वकिलांना देखील टोपी लावायला कमी करत नाहीत हि मंडळी.
तरी पक्षकारांनी हि वकिलांना क्रुपा करून समजून घ्यावे, कारण या कामाच्या तापात आणि ताणामुळे किंवा काम नसल्या मुळे येणाऱ्या नैराय्श्या मधून अनेक तरूण वकील देखील आयुष्य गमावून बसले आहेत, तर अनेक पारालीसीस सारख्या आजारांनी खिळलेले आहेत...
म्हणून माझ्या तरुण वकील मित्रानो आपण देखील पक्षकारांचा जास्त ताण घेऊ नये.
आपल्याला ना मेडिकल, ना पेंशन म्हणून घेऊ नका फुकटचे टेन्शन.
माझी माती माझी माणसं.
माझ्या आत्तापर्यंतच्या आयुष्यात माझे मित्र
परिवार हेच माझे विश्व आणि त्यांचे भवती माझे प्रेमाचे भावनेतून काहीतरी करून सतत सर्वांना
आपलेसे करण्याची भावना असल्याने मी मित्रांमध्ये नेहमी कुठल्या न कुठल्या कारणाने चर्चेत
असायचो. नियोजन कौशल्य हे देखील मला माझ्या मित्रांनी अनेक कार्यक्रम, कोणतीही ट्रिप
किंवा समारंभ असो माझ्यावर टाकलेला विश्वास यामुळेच शक्य झाले. मला प्रचंड साथ मिळाली
ती माझे मित्र अमोल आणि परीक्षित या माझ्या अतिशय जवळच्या मित्रांची. आयुष्यात घेतलेले
प्रेत्येक लहान मोठे काम मी नेहमीच त्यांचे सल्ल्यानुसार करण्याचा प्रयत्न करीत होतो.
त्यांच्यावर माझा प्रचंड भरवसा आणि विश्वास असल्याने त्यांचे माझ्या आयुष्यात विशेष
स्थान आहे. निंदकाचे घर असावे शेजारी अशी आपल्याकडे
म्हण आहे आणि त्याप्रमाणे माझ्या आयुष्यात देखील एक असा मित्र आहे [ नाव जाणीवपूर्वक
घेत नाही ]. ज्याने मला प्रेत्येक वेळेस माझ्या प्रत्येक कार्याची निंदा केली पण आयुष्यात
माझे कधी वाईट नाही चिंतले. मनाने निर्मळ असला तरी सिंह राशीचा असल्याने नेहमीच हुकूम
गाजवीत राहिला. तसे असूनही मित्र आणि माणूस म्हणून अतिशय चांगला. मला नेहमी असं वाटायचं की च्यायला जाम पैसा आला म्हणजे मनुष्य श्रीमंत होतो.नंतर नंतर माझ्या लक्षात आलं पैसा आला की तो "पैसेवाला" नक्की होतो पण "श्रीमंत" होतोच असं नाहीये. श्रीमंत या शब्दाची व्याख्या खुप मोठी आहे. वेदांमध्ये जी "श्री" नावाची देवता आहे ती लक्ष्मीपेक्षा थोडी निराळी आहे. श्री या संज्ञेत पैसा,यश, सौंदर्य, श्रेष्ठत्व, अधिकार, प्रतिष्ठा, उद्योगशीलता, सुस्वभावीपणा वगैरे वगैरे अनेक गोष्टी त्यात अनुस्युत आहेत. फक्त पैसा नव्हे. हे लक्षात आल्यावर मी आसपासच्या काही मंडळींचं निरिक्षण केलं आणि माझ्या लक्षात आलं की खरोखरंच यार पैसेवाला आणि श्रीमंत या दोन अत्यंत निरनिराळ्या कन्सेप्ट्स आहेत,गंमत म्हणजे प्रत्येक श्रीमंत हा पैसेवाला होताच पण प्रत्येक पैसेवाला हा श्रीमंत नव्हता.अनेक पैसेवाले असे आहेत की ज्यांना पैशाची "फिकीर नाही"अलोट आणि मुबलक पैसा आल्यावर त्या पैशाला शिस्तीचं वळण न लावल्यामुळे तो पैसा घरात लाथेलोटेसारखा असला तरी त्याला नियोजन नाही. बेफिकीरी, व्यसनाधिनता, उधळपट्टी, वागणूकीत अहंकार, बेशिस्त अनेक पैसेवाल्यांकडे पदोपदी दिसली मला. सगळीकडे झगमगाट होता पण त्या झगमगाटामागे दिखावा आणि माज होता..."मी किती महागाची स्कॉच पितो बघ" हे सांगण्यामागे ब्रॅन्डच्या कौतुकापेक्षा, पैशाच्या लेबलला जास्त व्हॅल्यु होती.. ही खरेदी आणि बेफिकीरी घरातल्या इंटॆरिअर पासुन लहानशा खरेदीपर्यंत जिथे तिथे दिसते...सुसंस्कृतपणा खुप कमी पैशेवाल्यांकडे आहे.
मुलं काय शिकतायत? यापेक्षा सगळ्यात भारी इंटरनॅशनल स्कूलमध्ये घातलंय याचंच वारेमाप कौतुक. वाचनसंस्कृती, अभ्यासूपणा, विचारशीलता, सुसंस्कृतपणा याचा जिथेतिथे अभाव दिसत होता. पण याउलट माझ्या परिचयातील कित्येक श्रीमंत मंडळी ही खुपच निराळी आहेत.
माझे प्रिय मित्र श्री.सुधीर मुतालीक म्हणजे दोस्तीच्या दुनियेतील राजा माणुस. सुधीर
सर हे नेहमी मलाच नाही तर अनेक तरुणांना प्रोत्साहित करीत असत आणि त्यांचे अचूक मार्गदर्शन मिळण्याचे भाग्य मला प्राप्त झालेले आहे. मी नेहमीच सुधीर सरांना मित्र रुपी गुरु असे म्हणत आलो आहे. माझ्यातील नेतृत्व कौशल्याची खरी ओळख मला सुधीर सरांनी वेळोवेळी करून दिली आहे आणि त्याच बरोबर मला आयुष्यात जमिनीवर राहण्याचा सल्ला देखील त्यांच्या कडून मिळालेला आहे. सुधीर सर म्हणजे अत्यंत यशस्वी उद्योजक असुन देखील त्यांचे पाय जमिनीवर असुन सर्वसामान्य माणसाला आपलेसे करून घेण्याची कला त्यांच्यात आहे आणि त्या कलेच्या जोरावरच हे विश्व त्यांनी निर्माण केले आहे. जिद्द, चिकाटी आणि आत्मविश्वास या आयुष्यात असलेल्या महत्वाच्या गोष्टी आहेत अणि स्वत: वर विश्वास असेल तर जग जिंकण्याची शक्ती तुमच्यात येते. अनेक वेळा आपण स्वत: वर विश्वास न ठेवल्याने अपयशला सामोरे जावे लागते. सुधीर सरांचे भाषेवरचे प्रभुत्व, स्पष्टवक्तेपना हे त्यांचे *यू एस पी* आहे असे मी मानतो. इतक्या कमी वयात एक अत्यंत यशस्वी उद्योगपतीच नाही तर अत्यंत लोकप्रिय आणि उत्तम व्यक्तिमत्व त्यांनी घडवले आहे याचे सर्व श्रेय हे त्यांच्या कठोर परिश्रम आंणि मेहनती मुळे आहे. पोटात आग आणि मनात जिद्द असेल तर हे सर्व शक्य आहे अणि "जिंदगी में कुछ बनना हो, कुछ हासिल करना हो, कुछ जीतना हो तो हमेशा अपने दिल की सुनो"
नाशिक
मध्ये २०२० मध्ये २५ जानेवारी २०२० ला भोंसला मिलिटरी स्कुलच्या मैदानावर १० हजार नाशिककरांनी एकत्र येऊन संपूर्ण वंदे मातरम् मुखोदगत करून,एकाच तालासुरात गायन केले. असा भव्य सोहळा आपल्या नाशिकमध्ये प्रथमच संपन्न झाला आणि त्याचे नियोजन समिती मध्ये सेवा करण्याची संधी मला सुधीर सरांनी दिली. सुधीर सर तूम्ही जो विश्वास आणि भरवसा माझ्यावर दाखवला त्याबद्दल मी तुमचा हृणी आहे. आज तुमच्या माझ्या वरच्या विश्वासामुळे सामाजिक कार्यक्रमात नाशिककरांना सुयोग शहा याची ओळख झाली असे मी मानतो.
मैत्री हि कधिच ठरवून होत नसते आणि आपले एखाद्या व्यक्तीशी सूर जुळला तर त्याच्यासाठी काहीपण आणि कधीपण.कृषी नगर चे ग्राउंड वर अनेक मित्र मिळाले आणि आजही ते माझे खूप छान मित्र आहेत. माझा उत्साही स्वभाव आणि मित्रांनी मला प्रोत्साहित केल्याने मला माझ्यात असलेले सुप्त गुण यांची ओळख व्हायला लागली. फोटोग्राफी करणे आणि कोणत्याही कार्यक्रमाचे आयोजन करणे हे मला माझ्या रनिंग ग्रुप चे मित्रांमुळे शक्य झाले. अनेक वेळेस डॉक्टर दुबे सरांनी मला कार्यक्रमाचे आयोजन करण्यास प्रोत्साहित केले तर आमचे सर्वांचे लाडके बाबूजी यांनी फोटोग्राफी साठी. रनिंग चे मित्रांबरोबर खूप वेगवेगळ्या ठिकाणी मॅरेथॉन साठी गेलो आणि खूप मॅरेथॉन पळालो. मॅरेथॉन धावल्याने आरोग्यावर खूप काही चांगला फरक पडत नाही तर तो तुमच्यातील किडा असतो बाकी काही नाही. त्यानिमित्ताने खूप प्रवास आणि मज्जा करता आली हे मात्र खरे. नवीन आठवणी आणि एकमेकांसाठी काही करण्याची वृत्ती यानिमित्ताने प्रबळ होत गेली. या सर्व मित्रांकडून सदैव सकारात्मक ऊर्जा मला मिळत असते आणि त्यामुळे का होईना नैराश्याला सामोरे जावे लागत नाही.कार्यक्रम कोणताही असो किंवा कार्यक्रम कोणाचाही असो तो मनापासून करायचा एवढे नक्की.
माझ्या शाळेतील, कॉलेजमधील आणि इतर सर्व मित्रांना दोन ओळी समर्पित करू इचछीतो -
जिंदगी हमेशा ख़ास नहीं होती, फूलों की महक हमेशा पास नहीं होती, मिलना तो हमारे नसीब में लिखा था, वर्ना इतनी बेशकीमती दोस्ती कभी इत्तेफ़ाक़ से नहीं होती !!
गेल्या ३५ वर्षापासून आदिवासी बांधवांना अविरतपणे रुग्ण सेवा देणारे तसेच यांच्या जीवनाविषयी..
मेळघाटात
गेल्या ३५ वर्षापासून आदिवासी बांधवांना अविरतपणे रुग्णसेवा देणारे तसेच पद्मश्री पुरस्कार प्राप्त असलेले डॉ.
रविंद्र कोल्हे यांच्या समवेत गप्पा गोष्टी व त्यांच्या जीवनाच्या खडतर प्रवासा विषयी जाणून घेताना....
त्यांच्या या आदीवासींच्या वेदनांवर फुंकर घालण्याच्या कामाची दखल घेवून सरकारने त्यांना पद्मश्री पुरस्काराने गौरविण्यात आलेआहे.
संपूर्ण महाराष्ट्रासाठी ही गौरवाची बाब आहे.
महाराष्ट्रात
कार्यरत असलेल्या अश्या आदर्श जोडप्याला माझा मानाचा मुजरा.
आज कोरोनाचे महाभयंकर प्रलयापासून आपण सर्व लढत असतांना अनेक गरीब लोकांसाठी जेवणाची व्यवस्था “अन्नपूर्णा” चे
माध्यमातून करण्यात येत
आहे. “अन्नपूर्णा” ची मूळ संकल्पना नाशिक चे प्रसिद्ध उद्योगपती श्री.सुधीर मुतालिक यांच्या संकल्पनेतून साकारण्यात आली. शिक्षणाचे निमित्ताने मुंबई,पुणे व
नाशिक येथे खानावळ, हॉटेल्स बंद असल्यामुळे शिक्षणासाठी बाहेर गावी असणारा राज्यातला एकही विद्यार्थी उपाशी झोपला नाही पाहीजे. नागरिकांनी गावागावात, वार्डशाः अन्नपूर्णा गट तयार करावेत. विद्यार्थ्यांनी ईमेलवर व्हाट्सएप्प वर त्यांची गरज कळवावी असे आवाहन अन्नपूर्णा चे माध्यमातून करण्यात आली. त्यांनी अन्नपुर्णा ची सुरुवात फेसबुक पेज चे माध्यमातून सुरू केली.हि संकल्पना खूप गरजू लोकांपर्यंत पोचली आणि त्याचे खूप विध्यार्थी वर्गाला फायदा झाला.

त्यातूनच मग पुढे नाशिक चे सुप्रसिद्ध उद्योगपती श्री. अविनाश आव्हाड व
व्यवसायाने वकील असलेले श्री. संजय मुंदडा, आर्ट ऑफ लिविंग चे माध्यमातून नाशिक मध्ये गरजु लोकांना,हॉस्पिटल मध्ये काम करीत असलेल्या डॉक्टरांना,उपचार घेत असलेल्या लोकांना तसेच अनेक गरीब वस्तींवर जाऊन त्यातला कोणीही उपाशी राहणार नाही याची काळजी घेत प्रशासनाचे मदतीने,नाशिक मध्ये हि अन्नपूर्णा ची संकल्पना राबवण्याचे ठरले आणि सर्व जण कामाला लागले. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण देशात लॉकडाऊन असतांना प्रचंड प्रमाणात मदतकार्य सुरू आहे,मग ते अन्न सामग्री, किराणा पासून तर औषधे पर्यंत कार्यकर्ते मोफत पुरवीतआहोत.आज पर्यंत लॉक डाउन चे ४५ दिवसात श्री. संजय मुंदडा परिवार आणि माहेश्वरी भवन येथून आणि यांचे मदतीने नाशिक मध्ये दर रोज ११००-१२०० लोकांची जेवणाची व्यवस्था करण्यात येत आहे. आज पावेतो लॉक डाउन च्या ४५ दिवसात ७३,६६० लोकांची जेवणाची व्यवस्था “अन्नपूर्णा” मार्फत करण्यात आली आहे.

अन्नपूर्णा, नाशिकचे वतीने ७३,६६० लोकांपर्यंत जेवणाचे डबे नाशिक मध्ये पोहचवणे शक्य झाले आहे. त्याच बरोबर ५०० गरजू कुटुंबांची रेशन ची व्यवस्था घरपोच करण्यात देखील अन्नपूर्णा ला यश आले आहे. अन्नपूर्णा चे सेवाकार्य मध्ये श्री.सुधीर मुतालिक,श्री. अविनाश आव्हाड,व्यवसायाने वकील असलेले श्री. संजय मुंदडा परिवार यांचे सोबत सामाजिक कार्यात सहभाग नोंदवून खूप आनंद प्राप्त झाला.
कोरोना चे निम्मिताने आई बाबा आणि आमच्या अद्वैत चे माझे पोलीस अधिकारी होण्याचे स्वप्न देखील पूर्ण झाले.
नाशिक चे पोलीस आयुक्त मा.श्री.विश्वास नांगरे पाटील यांनी माझी विशेष पोलीस अधीकारी म्हणून नियुक्ती केली.
नाशिक चे जिल्हाधिकारी मा.श्री. सुरज मांढरे यांचे मार्गदर्शनाखाली, नाशिक मध्ये अन्नपूर्णा ची संकल्पना राबविण्यात यश आल्याने त्यांनी सन्मानपत्र देऊन गौरव करून अजून प्रोत्साहित केले.
आयुष्यातील लक्षात राहणाऱ्या काही चुकांविषयी...
निर्णय चुकतात आयुष्यातले आणि आयुष्य चुकत जाते.. प्रश्न कधी कधी कळत नाहीत आणि उत्तर चुकत जाते..
सोडवताना वाटतं सुटत गेला गुंता.. पण प्रत्येकवेळी नवनवीन गाठ बनत जाते,दाखविणाऱ्याला वाट माहित नसते..चालणाऱ्याचे ध्येय मात्र हरवून जाते..दिसतात तितक्या सोप्या नसतात काही गोष्टी…...
"अनुभव" म्हणजे काय हे तेव्हाच कळते...असे मित्र बनवा जे कधीच साथ सोडणार नाही..असे प्रेम करा ज्यात स्वार्थ असणार नाही..असे हृद्य बनवा कि ज्याला तडा जाणार नाही..असे हास्य बनवा ज्यात रहस्य असणार नाही..असा स्पर्श करा ज्याने जखम होणार नाही..असे नाते बनवा ज्याला कधीच मरण नाही...
सुरेश भटांच्या चार सुंदर ओळी..आयुष्य छान आहे,थोडे लहान आहे......रडतोस काय वेड्या.? लढण्यात शान आहे...काट्यातही फुलांची झुलती कमान आहे.....उचलून घे हवेते,दुनिया दुकानआहे....
जगणे निरर्थक म्हणतो तो बेइमान आहे."सुखासाठी कधी हसावं लागंत तर कधी रडावं लागतं,कारण सुंदर धबधबा बनायला पाण्यालाही उंचावरुन पडावं लागतं"......
दोन शब्द जगण्याविषयी...
कुणाला आपला कंटाळा येईल
इतकं जवळ जाऊ नये !!!
चांगुलपणाचे ओझे वाटेल
इतके चांगले वागू नये !!!
कुणाला गरज नसेल आपली
तिथे रेंगाळत राहू नये !!!
नशीबाने जुळलेली नाती जपावी
पण स्वतःहून तोडू नये !!!
गोड बोलणे गोड वागणे
कुणास अवघड वाटू नये !!!
जवळपणाचे बंधन होईल
इतके जवळचे होऊच नये !!!
सहजच विसरून जावे सारे
सल मनात जपू नये !!!
नकोसे होऊ आपण
इतके आयुष्य जगूच नये !!!
हवे हवेसे असतो तेव्हाच
पटकन दूर निघून जावे
आपले नाव दुस ऱ्याच्या ओठी
राहील इतकेच करून जावे !!!
कारण
जीवनाच्या वाटेवर
साथ देतात,
मात करतात,
हात देतात,
घात करतात,
ती ही असतात..... माणसं !
संधी देतात,
संधी साधतात,
आदर करतात,
भाव खातात
ती ही असतात..... माणसं !
वेडं लावतात,
वेडं ही करतात,
घास भरवतात,
घास हिरावतात
ती ही असतात..... माणसं !
पाठीशी असतात,
पाठ फिरवतात,
वाट दाखवतात ,
वाट लावतात
ती ही असतात..... माणसं !
शब्द पाळतात,
शब्द फिरवतात,
गळ्यात पडतात,
गळा कापतात
ती ही असतात ...... माणसं !
दूर राहतात,
तरी जवळचीच वाटतात,
जवळ राहून देखील,
परक्यासारखी वागतात
ती ही असतात ...... माणसं !
नाना प्रकारची अशी
नाना माणसं,
ओळखायची कशी
सारी असतात आपलीच माणसं !!!
दोन शब्द जगण्याविषयी... लेखका विषयी माहीत नाही पण माझ्या भावना व्यक्त करण्याचा हा एक छोटासा प्रयत्न.
पर्यटन विषयी प्रेम व माहिती.
भटकंती चा प्रचंड नाद असल्याने भटकन्ती करणे आणि त्या सोबत मनमुराद फोटोग्राफी करणे
हे जणू एक प्रकारचे छंद म्हणा किंवा व्यसन आहे आणि असा छंद अथवा चांगले व्यसन असल्याचा
मला अभिमान आहे. फोटोग्राफी ( एस.एल.आर ) नव्हे मोबाईल फोटोग्राफी. कधी कधी आणि
सध्या जरा जास्तच पण "उद्धव" संचारतो माझ्यात (फोटोग्राफी पुरता मर्यादित)
आणि मी पण जणू काही राजाध्यक्ष यांचा एकमेव वारस असल्या प्रमाणे फोटो काढण्यात मग्न
होतो. प्रत्येक क्षण कॅमेरात टिपण्याचा प्रयत्न करत मला स्वर्गीय सुखाचा अनुभव येत
असतो. सोबत आमच्या सौ. (आदरार्थी बहुवचन) मैथिली आणि कुमार अद्वैत राजे बरोबर असतातच मधून मधून मला माझ्याच विश्वातून जमिनीवर आणायला. आपल्या आवडत्या गोष्टी आणि विशेष करून प्रवासाच्या
निम्मिताने आपल्या सुप्त कला गुणांना वाव मिळतो हे माझे स्पष्ट मत आहे. संपूर्ण जगाचा
प्रवास करणे हे कोणाचे स्वप्ना नसावे ? माझे तर नक्कीच आहे आणि त्या निम्मिताने मी
सतत प्रयत्नशील असतो. आयुष्यभर कष्ट आणि मेहनत करून पैसे कमवायचे आणि नंतर त्याच पैशांचा
उपभोग तुम्हाला घेता आला नाही तर काय उपयोग ? म्हणून आयुष्य एकदाच मिळते आणि ते सर्वस्वी
जगावे या माझ्या मताशी मी ठाम आहे. युरोप मध्ये देखील अनेक लोक गर्जे नुसार पैसे कमावतात,
भटकंती, प्रवास करून परत आपल्या उदर निर्वाहासाठी प्रयत्न करत असतात. सिंगापूर चे आकर्षण
लहानपणापासून होते आणि ते फिरण्याचे स्वप्न पूर्ण झाल्याचा अभिमान पण वाटतो. आपल्याकडे
कधी आपल्या शहराचा सिंगापूर होणार याचा विचार अनेक वेळेस मनात येवून गेला पण फक्त स्मार्ट सिटी असून उपयोग नाही तर लोक देखील स्मार्ट असावे लागतात. परदेशात रस्त्यांवरील स्वच्छता आणि वाहतुकीचे नियम पाळण्याची
असलेली मनोवृत्ती आपल्याला अनेक गोष्टी शिकवते. परदेशात गेल्यावर आपण तिथले सर्व नियम
कटाक्षाने पाळतो कारण भीती असते ती होणाऱ्या शिक्षेची आणि त्यापोटी भराव्या लागणाऱ्या
दंडाच्या रकमेची. कायदे आपल्या देशात पण आहेत आणि कदाचित जगात सर्वात जास्त कायदे तर
आपल्याक देशात आहेत तरी कायद्याचे पालन करणारे किती आहेत असे वाटते. आपली मानसिकता
बदलणे गरजेचे आहे आणि त्याशिवाय आपल्या शहराचे आणि देशाचे विकासाचे स्वप्ने बघणे म्हणजे
निव्वळ मुर्खपणा आहे.
मला आवडणारी जीवनाची सार सांगणारी प्रेमळ कविता -
मला सांगा सुख म्हणजे नक्की काय असतं,मला सांगा सुख म्हणजे नक्की काय असतं,
काय पुण्य असलं की ते घर बसल्या मिळत,मला सांगा सुख म्हणजे नक्की काय असतं,
काय पुण्य असलं की ते घर बसल्या मिळत,देव देतो तेव्हा छप्पर फाडून देतो,
हवय नको ते म्हणणं प्रश्नच नसतो,आपण फक्त दोन्ही हाथ भरून घ्यायचं नुसतं,
मला सांगा सुख म्हणजे नक्की काय असतं,मला सांगा सुख म्हणजे नक्की काय असतं,
काय पुण्य असलं की ते घर बसल्या मिळत.
माझी
फेसबुक वरील मैत्रीण !!!
फेसबुकच्या
भिंती वरती रोजच् भेटतेस तु मला...
तुझं
असणं,तुझे हसणं,हे सर्व पाहून माझे तुला सततचे लाईक करणे...
तुझे
नवीन नवीन फोटोज्,तुझे रोजचे अपडेट्स,खूपच बेचैन करतात मला....
कुठेही असलीस तरी पण
फेसबुक वर मात्र रोजच् भेटतेस तु मला....
शेअर
जे ही तू करतेस लाईक ते ते मी करतो
तुझ्या
प्रत्येक पोस्ट मध्ये मी काही तरी शोधत असतो..
त्यात
मी नसलो तरी फेसबुक वर मात्र रोजच् भेटतेस तु मला....
विरह
सहन होत नाही आणि सांगता ही येत नाही
तुला
हे माहित आहे आणि मलाही सांगता येत नाही..
म्हणून
तर तू रोज काय करतेस हे सांगायला तु प्रत्यक्ष भेटत नसलीस तरी फेसबुक वर मात्र रोजच्
भेटतेस तु मला....
क्रमशः तुझाच
सुयोग !!!
आयुष्यावर बोलू काही ह्या कार्यक्रमातील मला आवडलेली कविता...
जरा चुकीचे जरा बरोबर बोलू काही
चला दोस्त हो आयुष्यावर बोलू काही
जरा चुकीचे जरा बरोबर बोलू काही
चला दोस्त हो आयुष्यावर बोलू काही…
उगाच वळसे शब्दांचे हे देत रहा तू
भिडले नाही डोळे तोवर बोलू काही
चला दोस्त हो आयुष्यावर बोलू काही…
तुफान पाहून तीरावर कुजबुजल्या होड्या
पाठ फिरुदे त्याची नंतर बोलू काही
चला दोस्त हो आयुष्यावर बोलू काही…
हवे हवेसे दुख: तुला जर हवेच आहे
नको नकोसे हलवे कातार बोलू काही
चला दोस्त हो आयुष्यावर बोलू काही…
उद्या उद्याची किती काळजी बघ रांगेतून
परवा आहे उद्याच नंतर बोलू काही
चला दोस्त हो आयुष्यावर बोलू काही…
शब्द असुदे हातामध्ये काठी म्हणुनी
वाट आंधळी प्रवास खडतर बोलू काही
चला दोस्त हो आयुष्यावर बोलू काही…
जरा चुकीचे जरा बरोबर बोलू काही
चला दोस्त हो आयुष्यावर बोलू काही… 🙂
या जन्मावर, या जगण्यावर शतदा प्रेम करावे...
"शिकवे मुझे भी जिंदगी से है
साहब
पर मौज में जीता हूँ...
इसलिए शिकायते नहीं करता"
धन्यवाद - सुयोग शहा …
Check out Adv. Suyog. C. Shah on Social
media Pages -
दिनांक २४/०५/२०२० रोजी माझ्या जवळच्या मित्रांनी मला माझ्या ४०शीच्या सुरुवातीला दिलेल्या काही प्रेमळ शुभेच्छा.🌹🌹🌹
सुयोगचा उत्साह हा त्याच्या दोन महत्वाच्या पैलूंमधला पहिला पैलू. हा धडधडीत दिसणारा त्याचा गुण. पैलू किंवा गुण म्हणजे त्याच्या व्यक्तिमत्वाची ओळखच. सुयोग काय किंवा कोण आहे ? त्याची ओळख काय ? तर वकील वगैरे लौकीकार्थाची ओळख नंतर. आधी तो उत्साहाचा धबधबा आहे हीच त्याची ओळख. अक्षरशः धबधबा. त्यामुळे त्याला प्रत्येक क्षणाला हे करू की के ते करू याची धांदल असते. त्यामुळे त्याच्या समोर जर कुणी एखादी जबादारी ठेवली तर त्याला उद्योग शोधायचा किमान वेळ वाचला असा झालेला आनंद जबाबदारी देणाऱ्याला पटकन जाणवतोच. मी त्याला स्मार्ट पाहीजे किंवा वंदे मातरम या दोन मोठ्या उपक्रमामध्ये सहभागी व्हायला सांगितले होते. पट्ठ्याने बेफाम काम केले. वंदे मातरम संपल्या संपल्या लगेच हा वकिलांच्या राज्यव्यापी अधिवेशनाचा कार्यकर्ता झाला, तिथे देखील तेव्हढाच उत्साह ! त्याचा मित्र म्हणून मला हा प्रश्न पडतो की एव्हढी ऊर्जा हा आणतो कुठून ? ह्याची बॅटरी नेहमी 100 % चार्जड असते ! अशा चांगल्या अर्थाने उपद्व्यापी माणसांचे वागणे देखील इतरांना फनी वाटू शकते. तसा तो फनी आहे देखील ! बाली फुकेतच्या सहलीला एकटा - सोबत कुणीही न घेता - जाणारा हा आख्ख्या मानवी ईतिहासात पहिला प्राणी असावा, याची नोंद डार्विन आजोबांनी घेतली असेलच ! मैथिलीची शक्ती अद्वैतच्या शंभर पटीने ज्यास्त सुयोगला सांभाळण्यात खर्च होत असेल याची नोंद देखील चित्रगुप्त ठेवत असेल आणि त्या नोंदी ठेवण्यासाठी चित्रगुप्ताला 100 TB चा एक सर्व्हर खास सुयोगसाठी बसवून घ्यावा लागला असेल. तो सर्व्हर मंजूर करून घेण्यासाठी चित्रगुप्ताला इंद्र दरबारी किती खेटे घालावे लागले असतील आणि त्यासाठी त्याला सुयोगचे काय काय वर्णन करून सांगावे लागले असेल परमेश्वर जाणे ! फक्त त्या प्रोसेसमध्ये चित्रगुप्ताला तिरुपतीच्या बालाजीच्या साक्षीची भरपूर मदत झाली आहे असे म्हणतात. बालाजी सुयोगचे चाळे हा तिरुपतीला गेला की अधूनमधून बघतो ना ! अलीकडे सुयोग तिरुपतीमध्ये दान करून आलेले केस बालाजीने लाडूमध्ये केशर वापरल्यावर रिकाम्या झालेल्या डब्यांमध्ये वेगळे काढून ठेवले आहेत अशी आतल्या गोटातली बातमी आहे. त्या केसांची DNA टेस्ट करून हा ती ऊर्जा कुठून मिळवतो या विषयीचा रिपोर्ट इंद्राला पाठविण्यात येणार होता. चित्रगुप्ताने त्यासाठी खास प्रयत्न केले असे म्हणतात.
या सगळ्या उद्योगात सुयोगचा निरागसपणा उठून दिसतो. हा त्याच्या स्वभावाचा दुसरा पैलू. त्याला जगाची तमा न बाळगता आपल्यावर प्रयोग करायला आवडतात ही त्याच्या निरागस असण्याची ओळख आहे. कोण काय म्हणेल याची त्याला पर्वा नसते म्हणजे बेफिकिरी नाही. ही स्वच्छ चेहऱ्याची पावती आहे. त्यामुळे आजुबाजुच्या लोकांच्या समजुतीच्या फ्रेममध्ये तो बऱ्याचदा बसत नाही, याचा त्याला त्रास ही बऱ्याचदा होता. पण म्हणून तो थांबत नाही. तो प्रेशर कुकर आहे. आयुष्यात उद्योग सतत गोळा करत धडाधड अखंड शिट्टया वाजवतच रहातो. हा त्याचा स्वभाव त्याला आकर्षक बनवतो. त्याचमुळे तो खुप जणांचा लाडका मित्र देखील आहे. लोकांसाठी, त्यांना दिलासा देण्यासाठी, त्यांची भूक भागवण्यासाठी आपल्या आयुष्यात सतत खिचडी पकविणाऱ्या या प्रेशर कुकरला वाढदिवसाच्या वीस लाख कोटी शुभेच्छा -SudhirMutalik
प्रिय मित्र *सुयोग* ,
सर्वात पहिले प्रकट दिनाच्या खूप खूप शुभेच्छा ....
आपल्या आयुष्यात असे अनेक मित्र येतात पैकी फार कमी असे असतात कि ते कायम आपल्या मनात एक विशिष्ट घर करून असतात त्यापैकी एक म्हणजे नक्कीच सुयोग तू आहेस आणि राहशील .....
“सुयोग” – काका काकुनी नक्की काय विचार करून तुझे नाव सुयोग ठेवले असेल काय माहित पण नक्कीच हा योग चांगला म्हणून सुयोग असे नाव ठेवण्यात आले असेल कारण ह्या सुयोगाचा प्रत्यय नेहमीच येत असतो ,
तर आता साधारण 20 एक वर्ष झालेत आपल्या मैत्री ला .... तेव्हापासून आज पर्यंत तुला पाहत आलोय तुझ्या अनेक गमती जमती अनेक किस्से ह्या डोळ्यांनी बघितलेत अन अनुभवलेत देखील (त्याबद्दल सविस्तर नंतर कधीतरी – कारण बड्डे आहे भावाचा म्हणून फक्त छान छान ) ....
एन बी टी लॉ कोलेज चा पहिला मित्र आज तागायत चा आणि आज पावेतो हि मैत्री तशीच अबाधित आहे ....
मैत्री ला जागण तुला उत्तम रीत्या जमते कारण सुयोग म्हणजे असे रसायन आहे की कोणी मित्र अडचणीत असेल अन त्याने जर सुयोग ला फोन केला कि अमुक अमुक ठिकाणी लवकर ये तर हा विचारात नाही बसणार का , कशासाठी ..... तर हा वेळ काळाचा कसलाही विचार न लग्गेच तिथे मदतीला पोहोचणार ..... आणि असा तू माझा मित्र आहेस याचा खूप खूप आनंद आहे.
आज तू बऱ्या पैकी व्यावसाईक , सामाजिक दृष्टीने यशस्वी आहेस पण जरा धावपळ, गणगण कमी कर , सोशल मिडीया बाबत देखील जरा डीस्टन्सीग कर (म्हणजे बघ जमतंय का ) आणि मुख्य म्हणजे जरा आराम कर .....
बाकी मजा तर तू करतोसच सर्वाना सोबत घेऊन ..... ( संदर्भ – तुझ्या फेसबुक पोस्ट्स )
आहे तसाच रहा ..... म्हणजे ......
आई जगदंबा तुला उदंड आयुष्य देवो ..... अन तुझे सर्व स्वप्न पूर्ण करण्याची शक्ती देवो.....
Love You Mitra ….. Happy Birthday ......
तुझा मित्र
सुहास
🎂🎂सुयोग शहा🎂🎂
सुयोग आणि मी एकमेकांना 2001 सालपासून ओळखतो. मी 2001 साली नाशिक च्या NBT लॉ कॉलेजला ऍडमिशन घेतली आणि कालांतराने सुयोग, सुहास, सुरेश, कुमार, अजून एक दोघे आणि मी असा एक ग्रुप तयार झाला. या संपूर्ण ग्रुपमध्ये मी एकटीच मुलगी होते. माझ्या स्वभावधर्मास अनुसरून मी या सगळ्यांशी बोलत असले तरी तीन 'सु' शी माझी विशेष मैत्री होती, जी आजवर अबाधित आहे. सुहास, सुरेश आणि सुयोग पैकी सुयोग जरा उतावळा, चिडका, सरळमार्गी आणि प्रामाणिक मुलगा. सुहास, सुरेश आणि मी सुयोगशी तुलना करता जरा खोडसाळच म्हणायला हवे आणि त्यातही सुहास आणि मी जरा जास्तीच मापं काढायचो 😬, स्वतःसकट सगळ्यांची 😈!! सुयोग आमच्याबरोबर असायचा पण कधी छक्के पंजे करायचा नाही, म्हणजे तसा त्याचा स्वभाव नाही असा माझा तरी अनुभव आहे. जे मनात, डोक्यात चालू असेल तेच बोलायचा आणि तसाच वागायचा. गेल्या काही वर्षांत आमचा संपर्क फोनपुरता मर्यादित आहे त्यामुळे व्यवसायात उतरल्यावर त्यात बदल झाले असतील तर माहिती नाही पण वैयक्तिक पातळीवर माझं-त्याचं नातं अजुनही पूर्वीसारखंच आहे.
प्रस्तुतचं लिखाण सुयोगच्या अर्धांगिनीनं मागविलेलं असल्यामुळे निवडक प्रसंगच सांगणं अपरिहार्य आहे 😛.
प्रसंग 1-
ठिकाण- लॉ कॉलेज पार्किंग, नाशिक.
(म्हणजे बराच काळ आम्ही इथेच असायचो!)
संदर्भ : कशावरूनतरी (ते कारण न सांगणं हाच मैत्री धर्म!! 😅) सुहास आणि सुयोगचे वाद सुरू होते. आता कडाक्याचे भांडण होणार, इतक्यात...
सुयोग: तू नको शिकवू मला. मी बघेन माझं माझं आणि त्यातून माझा बाप समर्थ आहे निस्तरायला!
सुहास: तुझ्या बापाचं काय सांगतो रे, तुझा बाप समर्थ आहे तर माझा स्वामी समर्थ आहे!
अचानक आलेल्या या वाक्यामुळे सुयोग आणि सुहास या दोघांना आणि विशेषत्वाने मला हसू आवरेना. यावर सुयोग चिडून " काय च्यायला हा sincerely भांडतपण नाही! " या प्रसंगानंतर भांडण विसरून सुयोग आम्हा सगळ्यांना चहा प्यायला सलीम भाईंकडे घेऊन गेला.
अचानक एक दिवस सुयोगला बारीक होण्याचे वेध लागले. (तेव्हापासून मला फक्त वेधच लागत आलेत!) सुयोगनं त्यानंतर कुठूनतरी शोधून काढलं की मेथीची भाजी खाल्ल्यामुळे वजन कमी होते. त्यानंतर जवळपास दोन-तीन महिने सुयोग चालत कॉलेजला यायचा, रोज पळायला जायचा आणि रोज मेथीचीच भाजी खायचा! आम्ही सगळ्यांनी त्याची भरपूर चेष्टा केली. पण आज कबुल करायला हवं की ज्या निर्धारानं सुयोगनं तीन-चार महिन्यात वजन कमी केले ते वाखाणण्याजोगे होते. त्यानं ठरवलं आणि त्यानं केलं. ना तर आमच्या चेष्टेचा त्याच्या वागण्यावर परिणाम झाला, ना तर आमच्या नात्यावर.
माझ्यासकट कोणालाही अपेक्षित नसताना पहिल्या वर्षी मी LLB ला पहिली आले (याचं श्रेय माझ्या वडिलांना जातं. त्यांनी दुसऱ्याच्या नोट्स न वापरायच्या बोलीवरच मला LLB करायला परवानगी दिली होती.) बहुतांश मित्रांनी संय्यत प्रतिक्रिया दिली पण सुयोग आला आणि त्याचं पहिलं वाक्य
'मला वाटलं नव्हतं तू इतकी हुशार आहेस! च्यायला मी इतका अभ्यास केला, तू तर पार्किंग मध्ये असतेस, केलंस तरी काय?' वास्तवात या वाक्याचा मला राग येऊन तितकं बोलण्याच्या संधीचा मी लाभ घ्यायला हवा होता, पण सुयोग असल्यामुळे मी फक्त हसले! 🤷♀️
या प्रसंगानंतर उगाचच सुयोग माझ्याबद्दल आदरभाव दाखवायला लागला आणि मला अवघडल्यासारखं व्हायला लागलं.
शेवटी काही दिवस कॉलेज कट्ट्यावरच बसून मी त्याला मी कसा अभ्यास करते (म्हणजे केला तर!) हे सांगितलं! दुसऱ्या वर्षी नाही पण फायनल इयरला सुयोगनं पहिला नंबर पटकावलाकच. रिझल्ट लागेपर्यंत मी माझ्या घरी म्हणजे नाशिक सोडून गेले होते. रिझल्ट कळाल्यावर सुयोगला अभिनंदनाचा फोन केला. सुयोग खुश होताच पण निरागसपणे म्हणाला, ' काय उपयोग! आत्ता बक्षीस घ्यायला कॉलेजमध्ये गेलो तर बरेचसे बिनओळखीचे चेहरे...'
सुयोग आता प्रतिथयश, चांगला नावाजलेला कायदेतज्ज्ञ आहे. अनेक लेख, पुस्तकं आणि मान-मारताब पुरस्कार त्याच्या नावे जमा आहेत. मला वाटतं त्याची अचाट इच्छाशक्ती, जे ठरवलय ते करण्याची वृत्ती आणि प्रांजळपणे जे जसं आहे ते तसं मान्य करण्याची तयारी यामुळेच तो आहे या ठिकाणी पोहोचलाय. उत्तरोत्तर त्याची प्रगती होत राहणार आहे यात मला शंका नाही.
अशा या गडबड्या, काही प्रमाणात अति उत्साही, शिघ्रकोपी, तरीही हुशार, मनमिळाऊ आणि प्रामाणिक मित्राच्या नशिबानं त्याला सहन करणारी आणि त्याच्याबरोबरच सहजीवन आनंदानं वाटून घेणारी जोडीदारीण त्याला मैथिलीच्या रूपानं मिळाली. त्यामुळे त्याचं आयुष्य नक्कीच सुंदर झालेलं आहे.
सुयोग (सुहासच्या भाषेत) प्रकटदिनाच्या हार्दिक शुभेच्छा. मी फक्त योग्य प्रसंगच सांगितल्याबद्दल तू माझ्यावर खुश असशीलाच!
तुझीच मैत्रीण,
गौरी.
Mast Sir best journey of life
ReplyDeleteYou have a very bright future
GO head and live life ### Enjoy ####
Thanks a lot for your lovely wishes.
DeleteThank you so much ❤️🙏
DeleteGood idea. nice writeup keep it up
ReplyDeleteThanks a lot sir
DeleteFantastic Suyog
ReplyDeleteUr journey is very interesting & inspiring
Wish you Cum across many good paths further in your life.
Best wishes
Regards
Adv Sarika Shah
Thanks a lot for your lovely wishes.
DeleteThank you so much 💝
Delete