कविश्रेष्ठ (गदिमा) ग.दि.माडगूळकर यांचे शब्द आणि संगीतकार, महान गायक सुधीर फडके उर्फ बाबूजींच्या स्वरांची ती जादू.. बाबुजी यांचा आवाज हा वेगळाच. मुलायम आणि तरीही अत्यंत धारधार. अप्रतिम, हळवे करणारे गदिमांचे शब्द व बाबूजींच्या आवाजात मन प्रसन्न करणारे आणि जीवनाचे सार सांगणारे गीत रामायणातले हे गीत आहे. अर्थात या विषयी मी लिहावे एवढी माझी योग्यता नाही, पण तरीही माझ्या मनातले जे भाव आहेत ते शब्दात टिपण्याचा एक निर्मळ प्रयत्न मात्र आज मी करीत आहे.
माय कैकयी ना दोषी, नव्हे दोषितात
राज्य त्याग कानन यात्रा, सर्व कर्मजात
खेळ चालला से माझ्या पूर्व संचिताचा
पराधीन आहे जगतीं पुत्र मानवाचा…
माझ्या मनातलं माझं आवडीचं गाणं सांगायचं तर ते गीत रामायणातलं ‘दैवजात दुःखे भरता, दोष ना कुणाचा, पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा.’ ग. दि. माडगूळकरांची ही अर्थपूर्ण रचना व सुधीर फडक्यांचा मधुर आवाज अशा संगमातून साकार झालेलं हे गाणं मनाचा ठाव घेतल्या शिवाय राहात नाही. प्रत्येक कडव्यात एक सत्य सांगितलं आहे. ह्या गीतातील प्रत्येक शब्द, प्रत्येक ओळ प्रभू श्रीरामाने भरत व अयोध्या वासीयांचा निरोप घेणं हे दृष्य नजरे समोर तंतोतंत उभं करणारे आहे. गदिमांच्या काव्य प्रतिभेचं हेच तर वैशिष्ट्य आहे.
लहापणापासूनच माझ्या बाबांचे देखील गीतरामायण हा खूप आवडीचा विषय आहे.अनेक वेळेस मी त्यांना जर काही ऐकत असल्याचे किंवा गुणगुणत असल्याचे बघितले असेल तर ते गीतरामायणाचं बोल असत. गेली अनेक वर्षे गीतरामायणातील गाणी मी देखील प्रसंगानुसार ऐकत आलो आहे आणि सध्या माझी सकाळ हि देखील गीतरामायणाने होत असते याचा विशेष आनंद होतो. मला सुधीर फडके यांच्या आवाजातलं ‘गीतरामायण’ ऐकण्याचं भाग्य मिळालं असे मी समजतो. दहा कडव्यांचं हे गाणं श्रीरामाच्या भावनांचा आविष्कार आहे. बंधू भरताचा निरोप घेताना प्रभू श्रीरामाने ‘मी वनात जात आहे, तू अयोध्येचं राज्य सांभाळ, असा उपदेश केला आहे.
दैवजात दुःखें भरतां
दोष ना कुणाचा
पराधीन आहे जगतीं पुत्र मानवाचा
दोष ना कुणाचा
माय कैकयी ना दोषी, नव्हे दोषि तात
राज्यत्याग कानन यात्रा, सर्व कर्मजात
खेळ चाललासे माझ्या पूर्वसंचिताचा
पराधीन आहे जगतीं पुत्र मानवाचा
दोष ना कुणाचा
अंत उन्नतीचा पतनीं होइ या जगांत
सर्व संग्रहाचा वत्सा, नाश हाच अंत
वियोगार्थ मीलन होतें, नेम हा जगाचा
पराधीन आहे जगतीं पुत्र मानवाचा
दोष ना कुणाचा
जिवासवें जन्मे मृत्यू, जोड जन्मजात
दिसे भासतें तें सारें विश्व नाशवंत
काय शोक करिसी वेड्या, स्वप्निंच्या फळांचा?
पराधीन आहे जगतीं पुत्र मानवाचा
दोष ना कुणाचा
तात स्वर्गवासी झाले, बंधु ये वनांत
अतर्क्य ना झालें काहीं, जरी अकस्मात
मरण-कल्पनेशीं थांबे तर्क जाणत्यांचा
पराधीन आहे जगतीं पुत्र मानवाचा
दोष ना कुणाचा
जरामरण यांतुन सुटला कोण प्राणिजात?
दुःखमुक्त जगला का रे कुणी जीवनांत?
वर्धमान तें तें चाले…
पराधीन आहे जगती पूत्र मानवाचा दोष ना कुणाचा। गीतरामायणा मधले हे गीत ऐकत असताना कारूण्य आणि भक्तीरसाने ओथंबलेला काही वेगळाच तर सध्याच्या काळात हे गीतरामायणतील अजरामर काव्य खरचं किती बोलकं आहे. डोळ्यांना न दिसणाऱ्या एका छोट्या विषाणूने परग्रहावर जीवसृष्टी शोधणाऱ्या अचाट बुद्धिमत्तेच्या मानवाच्या अहंकाराला एका झटक्यात संपवले आणि जाणीव करून दिली की मानव या पृथ्वीचा मालक नसून इथला पाहुणा आहे. मानवा खेरीज असलेल्या जीवसृष्टीच्या जतनाची नैतिक जबाबदारी मानवावरच आहे. "पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा” हे खरे आहे. सृजनाचा विनाश करणारी कुबुद्धी फक्त मानवाला आहे. हे "भवताल' आपले नाहीच ते मानव खेरीज इतर जीवसृष्टीचे देखील आहे.
सगळं जग या एका कोव्हिड-१९ च्या नायनाटासाठी शर्थीने लढतयं, अनेकांचे मृत्यू होत आहेत, कित्येक जणांना या विषाणूचा संसर्ग होतोय !
जगभरात लाखों लोकं या समस्येत अडकली आहेत. आशेची वात तेवती ठेऊन आज कित्येक डॉक्टर्स, नर्सेस्, शास्त्रज्ञ यावर उपाय योजना करत आहेत, अनेक फार्मा कंपन्या अनेक क्लिनिकल ट्रायल करीत आहेत... पण तरी अजूनही या प्रयत्नांना यश मिळालं नाही आहे.
या परिस्थितीतून बाहेर आल्यानंतर यातून काही तरी शिकून आपल्यात बदल केला तर निसर्गाने दिलेल्या संधीचे आपण सोने केले असे म्हणता येईल. जिवनाचे हे सत्य आजं लख्ख प्रकाशात तळपतयं. माणसातील अहम्, त्याची समाजातील प्रतिष्ठा, या सगळ्या गोष्टी आज दुय्यम स्थानावर आहेत, कारण जगण्याची स्पर्धा प्रत्येकालाचं जिंकायची आहे. ही पराधिनता, अनिश्चितता लवकरात लवकर संपो ही आशा!!
“ दैवजात दु:खें भरतां दोष ना कुणाचा
पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा.....
© सुयोग शहा








